बोरविहिरचे ताई-तात्या आणि भावडु मामा
आज बोरविहीर च्या ताईंचे ( आजी) निधन झाले आणि अनेक आठवणी तरळून आल्या. वडिलांची १९८७ ला बोरविहीर ह्या गावी कारखान्यात नियुक्ती झाली. गावात राहत असताना श्री. सीताराम तात्या आणि सौ. भूरा ताई ह्या प्रेमळ दापंत्याशी ओळख झाली. एक मुलगा (भावडू मामा) आणि चार मुली असलेल्या ताई तात्यांनी माझ्या आईला पाचवी मुलगीच मानले. आणि हा ऋणानुबंध आजही जपला जातोय. लाकूड फोडत असलेल्या तात्यांना मदत म्हणून माझे वडील ( नाना) स्वतः हुन पुढे गेले. तात्यांना वाटलं हा नोकरदार माणूस काय लाकूड फोडेल. पण नाना शेतकरी कुटुंबातले तरुण , त्यांनी लगेच ते काम कोणतीही लाज न बाळगता पूर्ण केले. तात्यांनी लगेच ताईंजवळ सांगितले की , हा माणूस वेगळा आहे. ताई तात्यांशी तेंव्हापासून ओळख झाली. पुढे अमित दादाचा ( माझा मोठा भाऊ ) जन्म झाला आणि त्याला ताई तात्यांच्या घरीच आजोळ लाभलं. लहानपणापासून दादाला त्यांचा आणि त्यांना दादाचा लळा लागला आणि एक घट्ट नातं तयार झालं. शेतातून बैलगाडी वर येणाऱ्या तात्यांची बराच पुढे जावून दादा वाट पाहत बसे. मग तात्या त्याला बैलगाडीतून घरी आणत. त्या बैलगाडीला तसचं सोडून अग...